केंद्र सरकारची माघार; तीनही कृषी कायदे घेतले मागे!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी 9 वाजता देशाला संबोधित करताना सर्वात मोठी घोषणा केली आहे. कृषीविषयक तीन कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी घरी परतण्याचे आवाहन केले. हे तीन कायदे मागे घेण्यासाठी काही शेतकरी संघटनांनी बराच काळ आंदोलन केले होते.
आम्ही आमचं म्हणणं काही शेतकरी बंधुंना समजावून सांगू शकलो नाही!- पंतप्रधान नरेंद्र मोदी
ते म्हणाले, “आज मी तुम्हाला सांगायला आलो आहे की आम्ही तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आमचं म्हणणं काही शेतकरी बंधुंना समजावून सांगू शकलो नाही. शेतकऱ्यांचा युक्तिवाद समजून घेण्यात आम्ही कोणतीही कसर सोडली नाही. मी आंदोलक शेतकऱ्यांना घरी परतण्याचे आवाहन करतो. महिनाअखेरीस सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनादरम्यान तो संसदेद्वारे मागे घेतला जाईल,” असे पंतप्रधान म्हणाले.
“प्रयत्न करूनही आम्ही काही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हिताचे स्पष्टीकरण देऊ शकलो नाही. शेतकर्यांचाच एक वर्ग त्याला विरोध करत होता, पण आमच्यासाठी तो महत्त्वाचा होता. या शेतकऱ्यांनाही सर्वांनी समजावण्याचा प्रयत्न केला. आम्ही तिन्ही कृषी कायदे संवैधानिक प्रक्रियेनुसार संपुष्टात आणू”, असं यावेळी पंतप्रधान मोदींनी म्हटलंय.
“शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी तीन कृषी कायदे आणले. त्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य किंमत मिळावी यासाठी आम्ही हे केले. वर्षानुवर्षे ही मागणी होत होती. यापूर्वीही अनेक सरकारांनी यावर विचारमंथन केले होते. देशाच्या कानाकोपऱ्यातील अनेक शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिला. आमचे सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, विशेषत: लहान शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, देशाच्या कृषी जगताच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी, खेड्यातील गरिबांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, पूर्ण प्रामाणिकपणे आणि समर्पणाने शेतकऱ्यांसाठी हा कायदा चांगल्या हेतूने आणला होता, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.