जिवंतपणीच आई-वडिलांच्या सर्व इच्छा पूर्ण करणे म्हणजेच खरे श्राध्द!

मिठाईच्या दुकानात एक मित्र भेटला. मला म्हटला:आज आईच श्राध्द आहे, आईला लाडू खूप आवडायचे म्हणून लाडू घ्यायला आलो.
मला आश्चर्याचा धक्काच बसला, पाच मिनिटा पुर्वीच मी त्याच्या आईला मार्केटमध्ये भेटलो होतो. मी काही बोलणार तेवढ्यात, मित्राची आई हातात पिशवी घेवून तिथे स्वत: येवून पोहचली. मित्राला एक जोरदार थाप मारत मी विचारलं, “भल्या माणसां, हि कसली चेष्टा करतोयस वेड्या, आई तर आहे तुझ्या बाजूला..”
मित्र आईच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवत जोर जोरात हसत म्हटला, अरे भाऊ, आईच्या मरणानंतर गायी वासरे नी कावळ्यांना लाडू खाऊ घालण्या एवजी मी आईला जिवंतपणीच तृप्त करू इच्छितो. त्याचे असे मत होते कि, “जिवंतपणीच आई- वडिलांच्या सर्व इच्छा पूर्ण करणे म्हणजेच खरे श्राध्द”.
तो पुढे म्हटला, “आईला मधुमेह आहे, पण गोड खायला आवडते म्हणून मी नेहमी फ्रीज मध्ये काही न काही ठेवून जातो, जे जे तिला आवडत ते ते सर्व आणून ठेवतो, श्रद्धेनी लोक मंदिरात जातात , अगरबत्ती लावतात. मी पण लावतो ‘कासव छाप’, आई झोपायला जायच्या आधी, मच्छर हाकलायला.
सकाळी आई ग्रामगीता वाचायला बसते नियमित, मी तिचा चष्मा साफ करून देतो, माझा असा समज आहे कि देवाचे फोटो साफ करत बसण्यापेक्षा, आईचा चष्मा साफ करण्याने अधिकच पुण्य मिळेल” आणि मित्र त्याच्या आईसोबत निघून गेला.
मी घरी येवून सुन्न मनानी पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीचा विचार करत बसलो.
मित्राच्या भक्तीत मला जरा जास्तच तथ्य वाटलं.
रिती रिवाज म्हणून आपण श्राध्द करतो, पूर्वजांच्या नावानी पोटभर गोड धोड खातो, पण खरंच ते त्यांच्यापर्यंत पोहचत नाही, एवढे निश्चित.
अमेरिका आणि जपान सारख्या प्रगत देशात पण अशी टिफिन सेवा अजून तरी सुरु झालेली नाही. त्यांच्या जिवंतपणी, त्यांच्यावर दुर्लक्ष करणे, म्हणजे डोळे असून आंधळे होणे असे वाटते. खरे तर त्यांच्या उतार वयात आई वडिल , पैश्यापेक्षा प्रेम, आणि एक सच्चा आधार फक्त तुमच्यामध्ये शोधतात.
आजच्या स्पर्धेच्या युगात मुलांवर खूप जबाबदारी आणि वेगवेगळ्या प्रकारचे तणाव असतात, याची त्यांनाही पुरे पूर जाणीव असते. पण तरीही जी मुले आई वडिलांची काळजी घेवू शकत नाही त्यांना देवही माफ करणार नाही. आज कितीतर वृद्धः माता पिता, कुटुंबियांकडून अवहेलना झेलतांना आपण पाहत असतो यावर कवी धर्मेश ची ओळ आहे…
”आधी माता मग पिता.. मग घेईन प्रभू नाम …
मला नकोय दुसरे तीर्थ् धाम” !!
संत कबीर असे म्हणतात…
जीते बाप को रोटी नां दे |
मरे बाद क्यो पछतांये ||
मुठभर चावल धाबेपर झोककर |
कव्वे को बाप बनाये ||
संत तुकोबाराय असे म्हणतात…
भुके नाही अन्न |
मेल्यावरी पिंडदान ||
हे तो चाळवा चाळवि |
केले आपणची ठेवी ||
प्रिय मित्र-मैत्रिणीनो, मेल्यानंतर अन्न वाया घालवण्यापेक्षा आपण आपल्या आईवडिलांना जिवंतपणी काहीच कमी पडू देऊ नका… जिवंतपणी आपण आपल्या आई-वडिलांकडे दुर्लक्ष केल्यास आणि मेल्यानंतर अनेक पूजा- अर्चा आणि पिंडदान केल्यास काय उपयोग त्याचा ?
(लेख संग्रहित)