राज्यात उद्यापासून मंदिरे उघडणार; नियमावली ने करावे लागेल दर्शन!

मुंबई (वृत्तसंस्था) ठाकरे सरकारने घटस्थापनेपासून राज्यातील मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, दीड वर्षांपासून बंद असलेली मंदिरे उद्यापासून (ता. ७) उघडली जाणार आहेत. मात्र, देवदर्शनाला जाण्यापूर्वी भाविकांना नियमांचे पालन करावे लागणार आहे.
▶️ शिर्डीचे साईबाबा मंदिर
साईमंदिरात रोज 15,000 भक्तांनाच दर्शन. त्यासाठी ऑनलाईन पास दिला जाणार. ज्येष्ठ नागरिक, 10 वर्षांखालील मुले आणि गर्भवतींना मंदिरात प्रवेश नाही. कोरोना लसीकरण झालेले असावे, अन्यथा RT-PCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल लागेल. प्रसादालय सध्या बंदच राहिल.
▶️ विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, पंढरपूर
भाविकांसाठी सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत मंदिर खुले. रोज 10 हजार भाविकांना मुखदर्शन घेता येईल. त्यासाठी 5 हजार भाविक ऑनलाईन पासद्वारे, तर 5 हजार भाविकांना ऑफलाईन दर्शनपास मिळेल. फुलं, हार आणि प्रसाद नेण्यास मनाई आहे.
▶️ आई रेणुकेचा माहूर गड
नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माहूर गडावरील रेणूका मातेच्या नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरु आहे. दोन वर्षानंतर गडावर यात्रा भरणार असल्याने प्रशासनाने पुरेशी काळजी घेतली जात आहे.
▶️ तुळजाभवानी मंदिर, तुळजापूर
दररोज केवळ 15 हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार. मंदिरात प्रवेश असेल, मात्र अभिषेक व इतर विधींना परवानगी नाही. कोजागिरी पौर्णिमा उत्सव रद्द केला असून, 18 ते 20 ऑक्टोबरदरम्यान भाविकांसाठी जिल्हाबंदी असेल.
▶️ कोल्हापूरची अंबाबाई
मंदिराच्या चार पैकी केवळ एकच दरवाजा भाविकांसाठी खुला असेल. भक्तांच्या संख्येवर मर्यादा व मास्कची सक्ती. सर्वांचे थर्मल टेस्टिंग, सॅनिटायझरचा वापर होणार. खण, ओटी साहित्यावर निर्बंध. थेट गाभाऱ्यात प्रवेश नाही. पितळी उंबऱ्यापासून दर्शन घ्यावे लागणार.
▶️ सिद्धिविनायक मंदिर, मुंबई
दर्शनासाठी अॅपवरून बुकिंग करावे लागणार आहे. ज्येष्ठ नागरिक, मुले आणि गर्भवती महिलांनी दर्शनासाठी येण्याचे टाळावे. प्रवेशासाठी फक्त ऑनलाईन बुकिंग. दर तासाला 250 भाविक बुकिंग करु शकतील.