जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचे वर्चस्व!

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील ६ जिल्ह्यांतील जिल्हा परिषद निवडणुका व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी आज (६ ऑक्टोबर) मतमोजणी झाली. मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या या पोटनिवडणुकीत सर्वच पक्षांनी ताकद लावल्याचे दिसले. त्यामुळे राज्याचे लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागल होते.
नागपूर, पालघर, धुळे, नंदूरबार, अकोला आणि वाशिमच्या जिल्हा परिषदेसाठी आज मतमोजणी झाली. जिल्हा परिषदेच्या एकूण ८५ जागा, तर १४४ पंचायत समितीच्या जागांचा निकाल जाहीर झाले आहेत.
जिल्हा परिषदेच्या सर्व ८५ जागांचे निकाल हाती आले आहेत. त्यात काँग्रेस १७, राष्ट्रवादी १७ आणि शिवसेनेने १२ अशा मिळून महाविकास आघाडीने ४६ जागा जिंकल्या, तर भाजपने २३ जागांवर वर्चस्व राखले. उर्वरित १६ जागा अपक्ष व इतर पक्षांनी जिंकल्या आहेत.
➡️ जिल्हानिहाय निकाल
▶️ अकोल्यात वंचितचा डंका-
अकोला जिल्हा परिषदेच्या सर्व १४ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यात ९ जागांवर वंचित आणि इतर पक्षांनी बाजी मारली. राष्ट्रवादीला दोन जागा, तर भाजप, शिवसेना आणि काँग्रेसच्या खात्यात अवघी १ आली आहे.
▶️ नंदुरबारमध्ये आघाडी पुढे-
नंदुरबारमध्ये ११ पैकी भाजपने ४, शिवसेना व काँग्रेसने प्रत्येकी ३, तर राष्ट्रवादीने एका जागेवर विजय मिळविला.
▶️ धुळ्यात भाजप नंबर वन
धुळे जिल्ह्यात १५ पैकी १५ जागांचे निकाल हाती आले आहेत. त्यात भाजपने ८, राष्ट्रवादी ३, काँग्रेसने २ आणि शिवसेनेने दोन जागेवर विजय मिळविला.
▶️ नागपूरमध्ये काॅंग्रेसचे वर्चस्व
नागपूर जिल्ह्यात १६ पैकी ९ जागांवर विजय मिळवित काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व राखले. भाजपने तीन, राष्ट्रवादीने दोन जागांवर विजय मिळविला. उर्वरित २ जागांवर इतरांनी बाजी मारली.
▶️ वाशिममध्ये राष्ट्रवादी मोठा भाऊ
वाशिममधील सर्व १४ जागांचे निकाल जाहीर झाले असून, त्यात राष्ट्रवादीने ५, काँग्रेस आणि भाजप प्रत्येकी २, शिवसेना १ आणि इतरांनी ४ जागांवर विजय मिळविला.
▶️ पालघरमध्ये काॅंटे की टक्कर
पालघरमध्ये १५ पैकी भाजप व शिवसेनेला प्रत्येकी ५ जागांवर विजय मिळाला. राष्ट्रवादीने चार, तर एक जागा अपक्षाच्या खात्यात गेली.
▶️ पंचायत समितीचा निकाल
वरील ६ जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीत सर्व 144 जागांचेही निकाल जाहीर झाले आहेत. त्यातही महाविकास आघाडीने वर्चस्व राखल्याचे पाहायला मिळत आहे.
▶️ महाविकास आघाडी,आघाडी वर
महाविकास आघाडीला 73, भाजपला 33, तर अपक्ष व इतर पक्षांना 38 जागा मिळाल्या आहेत. पक्षनिहाय विचार केल्यास काॅंग्रेसला 35, भाजप 33, शिवसेना 22, राष्ट्रवादी 16 व इतर पक्षांनी 38 जागांवर सत्ता मिळविली आहे.