लोकांचा जीव महत्त्वाचा; राज्याभिषेक सोहळा घरातच साजरा करा!- खा.छत्रपती संभाजी राजे

कोल्हापूर (वृत्तसंस्था) माझ्यासाठी लोकांचा जीव महत्त्वाचा आहे,राज्याभिषेक सोहळा घरातच साजरा करा,असे आवाहन खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी शिवप्रेमींना केले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काही संघटनांनी आंदोलन सुरू केलं आहे. तर भाजपने या आंदोलनांना पाठिंबा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाजी छत्रपती यांनी हे विधान केल्याने त्याला महत्त्व आलं आहे.
संभाजी छत्रपती यांनी ट्विट करून आपली भूमिका व्यक्त केली आहे. छत्रपती घराण्यातील व्यक्तीचे काम पेटवणे नाही तर न्याय देणे आहे. आणि ताकतच पाहायची असेल तर योग्य वेळी ती दाखवू, असं संभाजी छत्रपती यांनी म्हटलं आहे.
ताकद दाखविण्यासाठी लोकांचे जीव घेणे योग्य नाही.त्यापेक्षा लोकांचे जीव कसे सुरक्षित ठेवता येतील हे महत्त्वाचे आहे. कारण माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
संभाजी छत्रपती यांनी काल ट्विट करून शिवराज्यभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं विधान केलं होतं. ‘मनामनात फुललेला शिवभक्तीचा सागर, उत्साहाचा क्षण, जल्लोषाचा परमोच्च बिंदू, भिरभिरणारे भगवे ध्वज, ढोल-ताशाने दुमदुमणाऱ्या कडे-कपाऱ्या अन् शिवछत्रपतींच्या अखंड जयघोषाने दणाणणारा दुर्गराज रायगड ! लाखो शिवभक्तांची हजेरी व सोहळ्याला चढलेला लोकोत्सवाचा साज ! दुर्दैवाने यावर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे यावर्षीचाही राज्याभिषेक सोहळा सर्वांनी घरात राहूनच साजरा करण्याचे आवाहन मी पुन्हा करत आहे. स्वराज्यातील नियम स्वतः छत्रपती शिवाजी महाराज सुध्दा पाळत असत. आपण त्यांच्याच आदर्शांवर चालणारे सच्चे शिवभक्त आहोत’, असं संभाजीराजे म्हणाले.
▶️ पुढील दिशा रायगडावरून जाहीर करणार
सर्व शिवभक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी रायगडावर जाऊन आपल्या सर्वांच्या वतीने सोहळा अखंडीतपणे साजरा करण्याची जबाबदारी माझी..! माझ्यासाठी आपला सर्वांचा जीव महत्वाचा आहे; यासाठी आपण घरीच थांबावे. तुम्हा सर्वांच्या न्यायाची बाजू व पुढील दिशा, ठरल्याप्रमाणे मी राजसदरेवरुन घोषित करेन’, असंही संभाजीराजे यांनी ट्विटरवरुन सांगितलं आहे.