महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून मंत्री छगन भुजबळांसह 6 जणांची निर्दोष मुक्तता!

मुंबई (वृत्तसंस्था) देशभर गाजलेल्या महाराष्ट्र सदन आर्थिक घोटाळ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना मुंबई सत्र न्यायालयाने दोषमुक्त केले. त्यांच्यासह समीर भुजबळ, तन्वीर शेख, इम्रान शेख, गीता जोशी, संजय जोशी यांचीही या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.
छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना, दिल्लीत महाराष्ट्र सदनाचे नुतनीकरण करण्यात आले होते. त्यावेळी भुजबळ कुटुंबीयांच्या कंपन्यांना विविध कंत्राटांच्या माध्यमातून साडे तेरा कोटींची लाच दिल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी छगन भुजबळ यांच्यासह अन्य 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
आपल्यावरील सगळे आरोप निराधार असून, ते रद्द करण्याच्या मागणीसाठी छगन भुजबळ, त्यांचे पुतणे समीर यांनी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज सादर केला होता. न्यायालयाने त्यांचा अर्ज मान्य करताना, या प्रकरणातून 6 जणांची निर्दोष मुक्तता केली.
एसीबीकडे आरोपींविरोधात कुठलेही सबळ पुरावे नसताना, या प्रकरणात गुन्हा नोंदविताना, तपास अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणे, बेकायदा कारवाई केल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने या प्रकरणात एक एक करीत सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे.
▶️ निर्णयाला आव्हान देणार!- दमानिया
न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.