जळगाव जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.57 टक्के!

0

▶️ जिल्ह्यात 1 लाख 36 हजार 442 रुग्णांची कोरोनावर मात.
▶️ जिल्ह्यात आजपर्यंत 12 लाख 28 हजार 864 संशयितांची कोरोना चाचणी.
▶️ जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या 2 हजार 288, पैकी लक्षणे असलेले अवघे 585 रुग्ण.

जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजना व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने जळगाव जिल्ह्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत कोरोनामुळे बाधित झालेल्या 1 लाख 41 हजार 289 रुग्णांपैकी 1 लाख 36 हजार 442 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.57 टक्क्यांवर पोहोचले असून ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब असली तरी नागरीकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेच्यावेळी प्रशासनाने राबविलेल्या माझे कुटूंब, माझी जबाबदारी अभियान व इतर उपाययोजनांमुळे जिल्ह्यात बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्क्यांच्यावर पोहोचले होते. मात्र जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर 10 फेब्रुवारीपासून हे प्रमाण कमी झाले तर 31 मार्च रोजी हे प्रमाण 84.92 टक्क्यांपर्यत खाली आले होते. परंतु त्यानंतरच्या काळात जिल्हा प्रशासनाने कोरोनाची साखळी खंडित (ब्रेक द चेन) करण्यासाठी आरोग्य, पोलीस, जिल्हा परिषद व महापालिका प्रशासनाच्या सहकार्याने अधिक प्रभावीपणे उपाययोजना राबवित बाधित आढळणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील तसेच संशयित रुग्ण शोध मोहिमेतंर्गत कोरोनाची लक्षणे दिसून येणाऱ्यांचे स्वॅब घेऊन कोरोना चाचण्या वाढविल्या होत्या. त्यामुळे बाधित रुग्णांचा लवकर शोध लागून त्यांचेवर वेळेत उपचार होत असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.57 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहेत. शिवाय मृत्यु कमी करण्यातही आरोग्य यंत्रणेला यश आले आहे.
जिल्ह्यात कोरोनाची साखळ खंडित करण्यासाठी आजपर्यंत 12 लाख 28 हजार 864 कोरोना संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी कोरोना विषाणू तपासणी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्यापैकी 1 लाख 41 हजार 289 अहवाल पॉझिटीव्ह तर 10 लाख 84 हजार 740 अहवाल निगेटिव्ह आले आहे तर सध्या 980 अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्याचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी दरही कमी होत आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत 1 हजार 628 व्यक्ति होम क्वारंटाईन असून 155 व्यक्ति विलगीकरण कक्षात आहेत. जिल्ह्यात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 2 हजार 288 रुग्णांपैकी 1 हजार 703 रुग्ण लक्षणे नसलेले तर 585 रुग्ण हे लक्षणे असलेली आहेत. लक्षणे असलेल्या रुग्णांपैकी 329 रुग्णांना ऑक्सिजन वायु सुरु असून 152 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!